माळशिरस लाईव्ह | राजवैभव सांस्कृतिक भवन नातेपुते येथे तपस्वी सम्राट १०८ सन्मती सागरजी महाराज यांचे सुयोग्य शिष्य, परम पूज्य आचार्य श्री १०८ सुविधी सागरजी महाराज यांच्या पावन प्रेरणेने आयोजित ‘जनकल्याण वाणी अमृत प्रवचनमाला’ उत्साहात सुरू असून, यामध्ये ‘भक्ती की शक्ती’ या विषयावर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रवचनात आचार्य श्री यांनी सांगितले की, भक्ती ही केवळ पूजा-अर्चा किंवा कर्मकांड नसून ती पूर्ण समर्पणाची भावना आहे. मनातील अहंकार, स्वार्थ आणि संशय दूर करून ईश्वराच्या चरणी स्वतःला अर्पण केल्यावरच खरी भक्ती जन्माला येते.
यावेळी रामकथेतील माता शबरी आणि भक्त शिरोमणी हनुमान यांच्या जीवनातील प्रसंगांद्वारे भक्तीचे सामर्थ्य स्पष्ट करण्यात आले. शबरीच्या निश्छळ प्रेमामुळे प्रभू श्रीराम तिच्या झोपडीत आले, तर श्रीराम नामाच्या बळावर हनुमानांनी अशक्य वाटणारी कार्ये यशस्वी केली. जिथे मानवी शक्ती कमी पडते, तिथे भक्ती विजय मिळवून देते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक शांती, संकटांवर मात करण्याची ताकद आणि दया, क्षमा, नम्रता, प्रेम यांसारख्या सद्गुणांचा विकास भक्तीमुळेच होतो. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनातून काही वेळ नामस्मरणासाठी द्यावा, असे आवाहन आचार्य श्री यांनी केले.
राजवैभव सांस्कृतिक भवन नातेपुते येथे दर रविवारी सकाळी ठीक ८.०० वाजता जनकल्याण वाणी अमृत प्रवचनमालेचे आयोजन करण्यात येत असून, तपस्वी सम्राट १०८ सन्मती सागरजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री १०८ सुविधी सागरजी महाराज यांच्या ज्ञानमयी प्रवचनांचा लाभ घेण्यासाठी सर्व धर्मप्रेमी नागरिक, सकल जैन समाज तसेच समस्त ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






